जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर अनेकांनी धावत्या एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या, आग लागल्याची अफवा पसरताच 30 ते 35 जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यातच समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात अनेक जण जखमी झाले असून, काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
असा झाला अपघात
ही ट्रेन परधाडे रेल्वे स्थानकाजवळ येत होती. तितक्यात पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एक्सप्रेसमधील लोक हादरून गेले. आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या. प्रवाशी या प्रकाराने चांगलेच हादरून गेले होते. त्यामुळे 35 ते 40 प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारल्या. समोरून गाडी येते की नाही याची खातरजमाही त्यांनी केली नाही. तेवढ्यात समोरून बंगळुरू एक्सप्रेस आल्याने बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात झाल्याचं काही लोक सांगत आहेत. अजून या घटनेची माहिती यायची बाकी आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.