चौपदरी महामार्गाचे गुरूवारी लोकार्पण कारंजा- मूर्तिजापूर चौपदरी मार्गाचे होणार भूमिपूजन

चौपदरी महामार्गाचे गुरूवारी लोकार्पण 

कारंजा- मूर्तिजापूर चौपदरी मार्गाचे होणार भूमिपूजन

अकोला, दि. २२ : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  अमरावती- कुरणखेड- शेळद महामार्गाच्या लोकार्पणासह कारंजा- खेर्डा- मूर्तिजापूर या चौपदरी महामार्गाचे भूमिपूजन उद्या गुरूवारी (२३ नोव्हेंबर) मूर्तिजापूर येथे दु. २.२० येथे होणार आहे.

 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अमरावती- चिखली पॅकेज एकमधील राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते कुरणखेड या ५४ किमी लांबीच्या, तसेच पॅकेज दोनमधील कुरणखेड ते शेलाड या ५० किमी लांबीच्या रस्त्याचे लोकार्पण होईल. या दोन्ही कामांचे मूल्य अनुक्रमे ९१२.४१ कोटी व ८१७.३५ कोटी रू. आहे. या संपूर्ण कामांचे निर्मिती मूल्य १७२९.७६  कोटी रू. आहे. त्याचप्रमाणे, कारंजा- खेर्डा- मूर्तिजापूर या २६.०८ कि. मी. रस्त्याचे भूमिपूजनही होणार आहे. या प्रकल्पाची किंमत ५९४.४४ कोटी रू. आहे.

असा होणार कारंजा- खेर्डा- मूर्तिजापूर रस्ता

भूमिपूजन होत असलेल्या या चौपदरी रस्त्याचे सिमेंट कॉक्रिंट दुभाजकासहित बांधकाम २६.०८ आहे. त्यात ८ लहान पूल, ३८ मो-या, १ पथकर वसुली नाका, रस्त्याच्या दोन्ही बाजूस सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम २५.२७६ किमी, संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड व कुंपण, पथदिवे ३.३५८ किमी, १० प्रवासी निवारे आदींचे नियोजन आहे. हे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.

या चौपदरी रस्त्यामुळे समृद्धी महामार्ग, तसेच तीन राष्ट्रीय महामार्ग, अकोला, मूर्तिजापूर, कारंजा, दर्यापूर ही शहरे जोडली जातील. या प्रकल्पांतर्गत अमृत सरोवर योजना राबविण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे अकोला व वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पूर्णत्वास जाणार आहे.

 

असा आहे अमरावती- कुरणखेड- शेळद महामार्ग  

अमरावती ते कुरणखेड टप्प्यात २ मोठे पूल, ४८ कल्व्हर्ट, २ वाहन भुयारी मार्ग,५ पादचारी भुयारी मार्ग, १० बस थांबे यांचा समावेश आहे. कुरणखेड ते शेळद टप्प्यात ४ मोठे पूल, ५६ कल्व्हर्ट, ११ वाहन भुयारी मार्ग, ४ पादचारी भुयारी मार्ग, १० बस थांबे यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५३ हा गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओरिसा तसेच देशातील इतर राज्यांमधील महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे जळगाव, खामगाव, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. हा महामार्ग रायपूर-नागपूर-सुरत किंवा पूर्व-पश्चिम कॉरिडॉरसाठी चांगली संपर्क सुविधा असल्यानेही महत्त्वाचा ठरतो.

बाळापूर येथील बाळादेवी संस्थान, डोंगरगाव येथील अंबादेवी संस्थान, काटेपूर्णा येथील चंडिकादेवी मंदिर, माना येथील रामकृष्ण मंदिर, जैन मंदिर अशा धार्मिक स्थळांबरोबरच काटेपूर्णा अभयारण्य व अनेक महत्वाच्या ठिकाणी जलद पोहोचणे या महामार्गामुळे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे, अकोला- मूर्तिजापूर या कापूस उत्पादक प्रदेशाचा कापडनिर्मिती होणा-या सुरत, नागपूर अशा शहरांशी वेगवान संपर्क होईल.

बोरगाव मंजू येथे ४.७०० किमी लांबीचा बायपासमुळे तेथील शहरातून जाणा-या वाहनांची गर्दी कमी होईल व वाहतूक सुरळीत होईल. प्रवासातील वेळही वाचणार आहे.  या प्रकल्पामुळे पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मितीचा विकास होणार आहे.

अमृत सरोवर योजनेंतर्गत मूर्तिजापूर ते अकोला परिसरात २१ सरोवरांची निर्मिती झाली. या कामातील मुरूम, मृदेचा वापर महामार्गासाठी झाला. महामार्गनिर्मितीबरोबरच जलसंधारणाचे कार्य याद्वारे साधले गेले.

अकोला ते वाशिम, अकोट, अकोला ते बार्शिटाकळी, मूर्तिजापूर ते कारंजा लाड, शेगाव या रस्त्यांशी महामार्ग जोडलेला असल्याने सर्वदूर दळणवळणाला गती मिळणार आहे. वाहन भुयारी मार्ग, पूल, पादचारी मार्ग यामुळे सुरक्षितता निर्माण होऊन वाहतूक सुरळीत होईल व

अपघातांचे प्रमाणही कमी होण्यासही याची मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news